२०१९ च्या मूळ आराखड्यानुसारच रेल्वे प्रकल्प राबवण्याची आग्रही मागणी.


अकोले तालुक्याला वगळल्याने शेतकरी आणि जनतेमध्ये तीव्र संताप


प्रकल्पाबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावण्याची विनंती.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. हा प्रकल्प २०१९ च्या प्रस्तावित मूळ मार्गानेच कार्यान्वित करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून, प्रकल्पातील बदलामुळे जनतेमध्ये असलेल्या असंतोषाची माहिती दिली आहे.

केंद्रीय रेल्वे विभागाने २०१९ मध्ये तयार केलेल्या अहवालानुसार, हा मार्ग नारायणगाव, संगमनेर, अकोले आणि सिन्नर असा प्रस्तावित होता. मात्र, नवीन प्रस्तावात अकोले तालुक्याला वगळण्यात आल्याचे समोर आले असून हा मार्ग आता नारायणगाव-संगमनेर-नाशिक असा दर्शवण्यात आला आहे. या बदलामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ सेंटरच्या तांत्रिक अडचणीचे कारण रेल्वेमंत्र्यांनी दिले असले तरी, मूळ आराखड्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती विखे पाटील यांनी केली आहे.


प्रतिनिधी: एनटीव्ही न्यूज मराठी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *