जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मोहराळा येथील २६ वर्षीय आदिवासी शेतमजूर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहराळा येथील नानसिंग बारेला, वय २६, हे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पत्नी आणि दोन मुलांसह गावात वास्तव्यास होते. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवत होते.
मात्र, ३ तारखेला रात्री त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केले आणि रात्री झोपले. मात्र सकाळी ते घरातून गायब असल्याचे आढळून आले. त्यांची पत्नी सुनिता मानसिंग बारेला यांनी शेजारी राहणारे सुनील बारेला आणि सहकाऱ्यांसोबत परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत.
नानसिंग बारेला यांचे काही कारणास्तव अपहरण करण्यात आले असल्याचा संशय असून, याबाबत परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. याप्रकरणी सुनिता बारेला यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता नानसिंग बारेला यांची उंची पाच फूट पाच इंच असून, रंग सावळा, केस कुरळे, नाक सरळ आणि दाढी बारीक आहे. त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फुल टी-शर्ट आणि काळी पॅन्ट होती.
या घटनेचा तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहितदीन सैय्यद आणि सहकारी राजेंद्र पवार करीत आहेत.
