
लातूर : राज्यात सन 2020-21 या वर्षांमध्ये कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. राज्यातील पोलीस दल कोरोना विरुद्ध लढाईत आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांच्या बरोबरीने गाव पातळीवरील पोलीस पाटलांनीही आपल्या प्राणाची परवा न करता आपले कर्तव्य बजावले होते.कर्तव्य बजावत असताना पोलिसा सोबतच काही पोलीस पाटलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या इतर शासकीय नोकरदारांप्रमाणेच गाव पातळीवर काम करणारे पोलीस पाटील यांच्या वारसदारांना सानुग्रह साह्य अनुदान म्हणून प्रत्येकी 50 लाख रुपये प्रदान करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटील दिवंगत श्रीरंग गोविंदराव पाटील, राहणार नदीवाडी, तालुका निलंगा जिल्हा लातूर आणि दिवंगत भागवत रामराव गुट्टे, राहणार येलदरवाडी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर हे आपले कर्तव्य बजावत असताना covid-19 चे संक्रमण होऊन आजारी पडल्याने त्यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.नमूद दिवंगत पोलीस पाटलांचा सानुग्रह सहाय्य प्रस्ताव पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या निर्देशान्वये पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक फुलचंद बनसोडे, प्रमुख लिपिक संभाजी कोलगणे, वरिष्ठ लिपिक राजेश्वर कुलकर्णी यांनी कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मार्फतीने महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव सादर करून प्रत्येकी 50 लाख रुपयाची रक्कम मंजूर करून घेतली.दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी कार्यालयात दोन्ही दिवंगत पोलीस पाटलांचे वारस पत्नींना प्रत्येकी 50 लाख रुपयाचे धनादेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नमूद पोलीस पाटलांच्या वारसांना त्यांना भविष्यात काही अडचणी आल्यास लातूर पोलीस सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून सहकार्य करेल असे आश्वासन दिले.यावेळी पोलीस उपाधीक्षक (गृह) अंगद सुडके, कार्यालय अधीक्षक फुलचंद बनसोडे, प्रमुख लिपिक संभाजी कोलगणे, वरिष्ठ लिपिक राजेश्वर कुलकर्णी, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते.
प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9850347529