- सिद्धार्थ महाविद्यालयात जयंती व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प..!
- बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांचा प्रेरणादायी प्रवास उलगडला..!

जाफराबाद प्रतिनिधी | दिनांक: ८ एप्रिल २०२६
जालना: “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या वेदना आणि विद्रोह जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी एका प्रभावी साधनाची गरज ओळखून पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या लेखणीने केवळ चळवळींना बळ दिले नाही, तर मूक समाजाला बोलके केले,” असे प्रतिपादन प्रो. डॉ. विजय पाटील यांनी केले.
जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
‘मूकनायक’ ते ‘प्रबुद्ध भारत’: एक धगधगता इतिहास
प्रो. डॉ. विजय पाटील यांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला:
- मूकनायक (३१ जानेवारी १९२०): मूक समाजाच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी या पाक्षिकाचा जन्म झाला.
- बहिष्कृत भारत (३ एप्रिल १९२७): या पाक्षिकातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वतः लिहीत असत, ज्यातून संघर्षाची दिशा स्पष्ट होत असे.
- जनता (२४ नोव्हेंबर १९३०): “गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा, म्हणजे तो बंड करून उठेल” ही या वृत्तपत्राची प्रेरणादायी बिरुदावली होती. पुढे ४ फेब्रुवारी १९५६ रोजी याचे नामकरण ‘प्रबुद्ध भारत’ असे करण्यात आले.
- लेखनाचे विषय: मंदिर प्रवेश, चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, रोटी-बेटी व्यवहार आणि सत्यशोधक चळवळ अशा ज्वलंत विषयांवर बाबासाहेबांनी प्रभावी लेखन करून समाज जागृत केला.
“खेड्यापाड्यातील लोकांचे मिळाले बळ” – प्राचार्य डॉ. राहुल म्हस्के
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. राहुल म्हस्के यांनी एका महत्त्वाच्या वास्तवाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “डॉ. आंबेडकरांचे लिखाण जेव्हा वृत्तपत्रात छापून येत असे, तेव्हा गावागावांतील शिक्षित वर्ग ते अशिक्षित लोकांसाठी वाचून दाखवत असे. या संवादामुळेच बाबासाहेबांच्या आंदोलनांना खेड्यापाड्यातील सामान्य माणसाचे मोठे बळ मिळाले.”
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील मेढे आणि उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. सरिता मणियार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. सुरेश पांडे यांनी मानले. राष्ट्रगीताने या ज्ञानयज्ञाची सांगता झाली.
वृत्त संकलन: प्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद, जालना.
