• पहिलीतील बालमित्र पंचावन्न वर्षांनंतर एकत्र; आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले..!

गंगापूर प्रतिनिधी | दिनांक: ०३ मार्च २०२६

छ. संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या १९७१ सालच्या इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा तब्बल ५५ वर्षांनंतरचा अभूतपूर्व स्नेहमिलन सोहळा रविवारी (दि. १ मार्च २०२६) उत्साहात संपन्न झाला. गंगापूर-वैजापूर रोडवरील श्री साईप्रसाद हॉटेल अ‍ॅण्ड रिसॉर्ट येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाने मैत्रीचा एक अनोखा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

सहवाद्य मिरवणूक आणि भावूक स्वागत

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य प्रवेशद्वारापासून सहवाद्य मिरवणुकीने करण्यात आली. श्री दत्त दिगंबर यांचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सोहळ्याला प्रारंभ झाला. ५५ वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याने अनेक मित्रांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. मांजरी, माहुली, शिंगी यांसह पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथून विद्यार्थी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते.

मान्यवर आणि गुरूजनांचा सत्कार

या सोहळ्याला विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक धोंडोपंत बनसोड सर, बोरुडे सर, राणे सर आणि आदर्श शिक्षक अच्युतराव कुलकर्णी सर उपस्थित होते. तसेच शिक्षिका शालिनीताई कुलकर्णी यांचे सुपुत्र उद्योजक डॉ. मुकुंदराव कुलकर्णी आणि भारतीय रेल्वे (पुणे) चे मुख्य प्रबंधक रवींद्र धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दिवंगत शिक्षक, विद्यार्थी व नातेवाईकांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आठवणींचा प्रवास आणि मार्गदर्शन

कार्यक्रमात गीते, पोवाडे आणि अभंगांच्या सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

  • रवींद्र धुमाळ: त्यांनी रेल्वेसंदर्भातील माहिती दिली आणि मांजरी गावासाठी सकारात्मक कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.
  • डॉ. मुकुंदराव कुलकर्णी: “विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे, मोठी स्वप्ने पाहावीत,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी मांजरी गाव आणि शाळेच्या विकासासाठी भविष्यात योगदान देण्याचे आश्वासन दिले.

सन्मान आणि सहभाग

कार्यक्रमात १९७१ च्या पहिलीतील एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व वर्गमित्रांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर: दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी रमाकांत बनसोड, पत्रकार संघाचे विजय बनसोड, गणेश म्हैसमाळे, गोपाळ बनसोड आणि हॉटेलचे मालक संदीप दारुंटे उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी परिश्रम

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण माघाडे, अ‍ॅड. विजय क्षीरसागर, रमेश सोनवणे, अ‍ॅड. उद्धव दारुंटे, रावसाहेब जेऊघाले, भाऊसाहेब चव्हाण, बाबासाहेब टेमकर, शिवाजी लोहकरे, सुधाकर जोशी, शिवाजी गायकवाड, बापू मनाळ, दिलीप नावंदर, संजय निसाळ, दादासाहेब मनाळ, शमशुद्दीन शेख, समाधान जोशी, रमेश रत्नपारखे, डॉ. मुकुंद कुलकर्णी, एकनाथ लांडे, नानासाहेब कणसे, अनिल दारुंटे, प्रकाश शेंडे, प्रकाश चित्ते, बाबासाहेब शिंदे, निवृत्ती उदमले, प्रल्हाद भडके आणि गोरख घाटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


वृत्त संकलन: अमोल पारखे, गंगापूर, छ. संभाजीनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *