गडचिरोली : कंपनी कोणतीही असो, ज्याच्या हातात ५२ टक्के शेअर्स, तो कंपनीचा मालक, हे सर्वमान्य सूत्र आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाची लोकसंख्या १४० कोटीच्या घरात आहे आणि त्यातले सुमारे ७५ कोटी लोक ओबीसी आहेत. एक व्यक्ती एक मत, हे मतदानचं सूत्र आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा नुसताच घोळ सुरू आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना गाई – म्हशी – बकऱ्या वाटण्याचा कार्यक्रम सरकारने मागे राबवला होता. त्याचा फायदा गावातले पाटील, सरपंच किंवा अन्य राजकारणी लोक उचलायचे. गाई म्हशी शेतकऱ्याच्या नावावर असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्या सरपंच किंवा पाटलाच्या गोठ्यात असायच्या. तिचं दूध, दही, शेण सारं पाटलाला मिळत असे. नाव मात्र शेतकऱ्याचं !

ओबीसीचे आरक्षण हा तसलाच प्रकार आहे. स्थानीय स्वराज्य संस्थांमधील ओबीसींना मिळणाऱ्या राजकिय आरक्षणाचा फायदा ओबीसींना कमी आणि विविध राजकीय पक्षाच्या पाटलांना जास्त होत होता. बहुसंख्य ओबीसी प्रतिनिधी त्यांच्या पक्षाचे वेठबिगार होते, गुलाम होते. राजकीय पक्ष अशा लोचट, लाचार लोकांनाच उमेदवारी देत असतात. स्वाभिमान आणि समाजहित गहाण टाकणे, ही तिकीट मिळण्याची पहिली अट असते. ओबीसींना मिळणारं हे थातूरमातूर राजकीय आरक्षण नुकतंच रद्द करण्यात आलं. केंद्र सरकार डाटा द्यायला तयार नाही. राज्य सरकार डाटा गोळा करायला इच्छुक नाही. डाटा सादर केला तरी आरक्षण मिळेलच असेही नाही. सध्या एकमेकांच्या नावाने बोंब मारणे सुरू आहे.

ह्या कारस्थानात फडणवीस मुख्य आरोपी असले, तरी केवळ त्यांच्याच पक्षाला सारा दोष कसा देता येईल ? या पापात त्यांचा वाटा नेमका किती ? फडणवीस पाच वर्षे आणि मनोहर जोशी चार वर्षे, असे हे दोन मुख्यमंत्री सोडले तर बाकीचे मुख्यमंत्री नेमके कोण होते ? त्यांनी का नाही दिले ओबीसींना संख्येएवढे आरक्षण ? त्यांनी का नाही होऊ दिला ओबीसी मधील मुख्यमंत्री ? ओबीसी हा ठेवलेल्या घरचा मुलगा आहे का ? इतके दिवस ओबीसी नेते चूप का राहिलेत ? कुणी अडवले होते ?

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. तेव्हापासून आतापर्यंत २८ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली गेली. त्यात तीन वेळा (म्हणजे दीड दिवसाचा गणपती धरून..) ब्राह्मण मुख्यमंत्री झालेत. १७ वेळा मराठा मुख्यमंत्री झालेत. ह्यात एकही ओबीसी मुख्यमंत्री का नाही ? ‘मराठा आणि कुणबी एकच’ म्हणून सोयीस्कर दिशाभूल करणाऱ्या लोकांना १७ पैकी एकदाही निदान कुणबी तरी मुख्यमंत्री व्हावा, असे का वाटले नाही ? (.. शिवाय ओबीसी मधील माळी, तेली ह्या प्रमुख जाती तर दूरच राहिल्या.) रामजन्मभूमी ट्रस्ट मध्ये १५ पैकी १४ ट्रस्टी उच्चवर्णीय आहेत. ओबिसीचा एकही प्रतिनिधी नाही. हा काही योगायोग नव्हे. तसाच २८ वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारामध्ये एकट्या मराठा समाजाचे १७ लोक होते, हाही केवळ योगायोग म्हणता येणार नाही. किंवा त्यात एकही ओबीसी नाही, हाही योगायोग असू शकतो का ?

कुणी अल्पसंख्याकांच्या विरोधात भडकवून ओबीसींना धार्मिक षडयंत्रात अडकवतात, तर कुणी ब्राम्हणांच्या विरोधात भडकवून उल्लू बनवतात. ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करतांना मात्र दोघेही एकच असतात. ओबीसींना हक्क द्यायला दोघांनाही नको असते.

नुकताच कुठे ओबीसी समाज धार्मिक अफूच्या गुंगितून बाहेर यायला लागला होता. हे लक्षात येताच, त्याला इतिहासाच्या नशेचा कडक गांजा मोठ्या हुशारीने पुरवला जातो. ओबीसी समाज पुन्हा नव्या दुष्टचक्रात अडकतो. आधी ‘बुवा-बापू’ यांच्या टोळ्या होत्या, आता तुफानी भाषण करणाऱ्या पोपटांच्या नव्या फौजा आल्या आहेत. त्या आम्हाला नेमकं काय सांगतात ? कुणाचा भाला कसा शेकडो फूट लांबचा वेध घेत होता, कुणाच्या तलवारीचे वजन किती मणाचे होते, कुणाचा घोडा किती फर्लांग उडत होता, हे यांच्या भाषणाचे विषय ! तेच आमच्या अभिमानाचे विषय ! ह्या पोपटाच्या फौजा अचानक कुठून उगवल्या ? कुणी तयार केल्या ? कशासाठी तयार केल्या ? त्यांना वजनदार पाकीट देवून बोलावणारे लोक कोण आहेत ? पूर्वी धर्माच्या नावावर पुराणकाळात ढकललं जात होतं, आता हे नवे सरदार अतिरंजित इतिहासात बुडवून बुडवून समाजाला मारत आहेत. डोकं वर काढूच देत नाहीत. वर्तमानात येऊ देत नाहीत. आजूबाजूला डझनावारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असतात, याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसते ! जिजाऊ माँ साहेब, शिवाजी महाराज, संभाजी राजे अशावेळी कसे वागले असते, हे किती वक्ते सांगतात ? स्वतंत्र भारतात होणाऱ्या ह्या आत्महत्यांना कोण जबाबदार आहे, हे किती वक्ते सांगतात ? किंवा का सांगत नाहीत ?

आता आम्हाला सत्यनारायणाच्या कथा नकोत, संतोषी मातेचे व्रत नको, तसेच इतिहासातल्या शिळ्या कढीला पुन्हा पुन्हा ऊत आणण्याचे उपद्व्याप देखील नकोत. इतिहासातला १०/१५ टक्के भाग प्रेरणा घेण्यासाठी पुरे आहे. किमान ८५/९० टक्के भाग हा वर्तमानाशी निगडित हवा. किती दिवस इतिहासाचे पवाडे ऐकत जगायचं ? इतिहास महत्त्वाचा की शेतकऱ्याला वीज मिळत नाही, हे वर्तमान महत्त्वाचं ? किल्ले महत्त्वाचे की युवकांना रोजगार देणारे कारखाने महत्त्वाचे ? याचं स्मारक, त्याचा पुतळा, अमक्याला भारत रत्न.. असल्या मागण्या महत्त्वाच्या की जागतिक दर्जाची विद्यापीठं, उच्च दर्जाची संशोधन केंद्रं, यांची मागणी महत्त्वाची ?

धर्म ही नशा असेल, तर इतिहास ही देखील नशाच आहे ! त्यात वाहवत जाण्यात काय अर्थ आहे ? ऐट मारणारे कालचे राजे वर्तमानात जर कुणाच्या दरबारी झाडू मारत असतील तरी त्यांना राजे मानायचे का ? का म्हणून ? कशासाठी ? इतिहासाचं मढं आपल्या उरावर कशाला ?

ओबीसींनी यातून बाहेर येण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन केलं पाहिजे.


तुम्ही ५२ टक्के आहात. लोकशाही व्यवस्थेतले तुम्ही राजे होऊ शकता. ती ताकद राज्यघटनेने खुद्द तुम्हाला दिली आहे. मग भीक कुणाला मागता ? कशासाठी मागता ? कुणाच्या मार्फत मागता ? याचा विचार करा.
प्रस्थापित लोकांनी तुमच्यात काही दलाल सोडलेले आहेत. ते दिशाभूल करतील. गोळ्या बिस्कीट मिळाले तरी देणाऱ्याचे अभिनंदन करतील. मेळावे घेतील. जे तुमच्या हक्काचे मारेकरी आहेत, त्यांच्याच गळ्यात हार घालतील. जयजयकार करतील. अशा लोकांपासून ताबडतोब दूर व्हा. स्वतंत्र व्हा. लाचारी सोडा.
स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्यानंतरही शेतकरी बापाच्या आत्महत्या होतात, हे जीवघेणं सत्य आहे. हाच तुमचा लाजिरवाणा इतिहास आहे. हेच तुमचे वर्तमान आहे. आणि याची जाणीव ठेवूनच तुम्हाला तुमचे भविष्य घडवायचे आहे. हे आपल्या मेंदूमध्ये भरून ठेवा.
पोथी – पुराणांच्या विळख्यातून बाहेर येण्याआधीच आम्हाला इतिहासाच्या अंधेरी गुहेत ढकलून देण्याचे षडयंत्र नियोजनपूर्वक राबवले जात आहे, त्यापासून सावध व्हा. इतिहासाच्या सापळ्यात अडकून पडू नका. बाहेर या. वर्तमानात या. भविष्याचा विचार करा. शुद्धीवर या. शहाणे व्हा. संघटित व्हा. ओबीसी मुक्तीच्या लढ्यासाठी निर्धाराने पुढे या.
• ‘आम्हाला राजकीय आरक्षण द्या..’ असली भीक मागणे बंद करा. त्यांचे १९ टक्केही नको अन् २७ टक्केही नको. ५२ टक्के आहात. एकत्र या. सत्तेच्या चाव्या हातात घ्या. इतर वंचितांना सोबत घ्या. संख्येएवढी सत्ता त्यांनाही देऊ, असा निर्धार करा.
सकारात्मक नियोजन करा. ‘निवडणुकीवर बहिष्कार टाकू, नोटा वापरू’ असले पोरकट विचार मनातून काढून टाका. त्यामुळे विरोधकांचाच फायदा होणार.. आणि सारे बनेल राजकारणी तुमच्या मुर्खपणावर मनोमन हसणार !
तुम्ही बहिष्कार टाकल्यामुळे निवडणुका होणार नाहीत, असला विचार करणे म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे. तुम्हीच काय ९५ टक्के लोकांनी जरी बहिष्कार टाकला आणि केवळ ५ टक्के लोकांनी मतदान केले तरी निवडणुका होतील. आसाम विधानसभेचे उदाहरण लक्षात ठेवा.
गावा गावातून जागृती करा. स्वतंत्र समित्या स्थापन करा. स्वतंत्र पॅनल उभे करा. आपले उमेदवार उभे करा. पण कोणत्याही प्रस्थापित पक्षाला मतदान करू नका.
आपला उमेदवार निवडून आला तर फारच छान. पडला तरी हरकत नाही. डिपाॅझिट जप्त झाले तरी हरकत नाही. मात्र प्रस्थापितांना मत देवू नका.
निवडून आलेला उमेदवार पुन्हा कोणत्या पक्षात पळाला तर काय, याची चिंता आज करू नका. तुमच्यामुळे प्रस्थापित उमेदवार पडला ही गोष्ट फार मोठी आहे. त्याचे दूरगामी परिणाम होतात.
याचाच अर्थ असा, की बहिष्कार प्रस्थापित पक्षावर टाका. त्यांच्या उमेदवारावर टाका. निवडणुकीवर बहिष्कार नको. ते आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे.
विचारपूर्वक आणि व्यावहारिक नियोजन करा. काही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या नंबरवर लोकजागर सोबत संपर्क करा. चर्चा करा. पण, राजकीय आरक्षणाची भीक मागणे सर्वात आधी बंद करा.
ओबिसींचं फक्त आरक्षण गेलं आहे, निवडणूक लढण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार गेलेला नाही. त्यामुळे रडत बसू नका. मैदानात या. एकत्र होऊन विरोधकांना धडा शिकवा.
आम्ही भिकारी नाही, हे मनाशी पक्के ठरवून घ्या. ज्या दिवशी हे कराल, त्या दिवशी नवा इतिहास लिहिला जाईल आणि त्यात तुमचंही नाव सन्मानाने सहभागी असेल, याची खात्री बाळगा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्याचे क्रेडिट त्याला द्या. ज्याचा मान त्याला द्या. मेरी मुर्गिकी एकही टांग.. असल्या अर्धवट वागण्याने ओबीसी चळवळीचे फार नुकसान झाले. माझ्यापेक्षा दुसरा कोणीही मोठा नाही, हुशार नाही, ही भूमिका सोडा. ज्याची मदत झाली, त्याचा आदराने उल्लेख करा. मात्र प्रस्थापित पक्षातील नेते, त्यांच्या संलग्न संस्था, त्यांचे पदाधिकारी, यांचा चुकूनही उदोउदो करू नका. तुमचे खरे शत्रू तेच आहेत, कारण तेच समाजाची दिशाभूल करतात, हे कायम लक्षात ठेवा.
विशेष म्हणजे राजकीय डावपेच नीट समजून घ्या. तिथे पुस्तकी पंडिती कामात येत नाही.
आम्ही ( लोकजागर ) सांगतो, त्यावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कुणावरही ठेवू नका. आधी नीट विचार करा. करणी आणि कथनी यातील फरक आणि तथ्य तपासून घ्या. सत्य असेल तरच विश्वास ठेवा. योग्य निर्णय घ्या. पटल्यास सोबत या. कोणत्याही भ्रमात राहू नका.

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष, लोकजागर
9822278988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *