• महिनाभरापासून गटारीचे काम प्रलंबित
  • ठेकेदाराच्या मनमानीचा ग्रामस्थांचा आरोप
  • पाणी साचल्याने आरोग्याचा धोका
  • साथीचे रोग पसरण्याची भीती
  • लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्षाचा आरोप
  • काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी

JALGAON | यावल तालुक्यातील दहिगाव येथे सावखेडा सिम रस्त्यालगत गटारीचे काम गेल्या महिनाभरापासून प्रलंबित आहे. गटारीसाठी खोदकाम करूनही बांधकाम पूर्ण न झाल्याने पाणी साचत असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दहिगाव येथील सावखेडा सिम रस्त्यालगत गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र गटारीसाठी केलेले खोदकाम अद्याप तसेच असल्याने ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पाणी साचल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा ठेकेदाराला सूचना करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. संबंधित लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
परिसरातील अनेक गटारीची कामे एकाच ठेकेदाराकडून सुरू असून, एक काम पूर्ण करण्याआधी दुसरे काम सुरू केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप असून, नवनिर्वाचित प्रशासकांनी लक्ष घालून काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रतिनिधी | एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *