फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर शहरासह ग्रामीण भागातही सर्वत्र मोठ्या प्रमाणात थंड पाण्याच्या जारची विक्री होत असून, या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक पाणी विक्रेते आरोग्यविषयक नियमांचे पालन न करता व्यवसाय करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे सर्व पाणी जार विक्रेत्यांच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी,अन्न व औषध प्रशासनानेही या बाबीकडे लक्ष देवुन तपासणी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
ऊन्हाळ्यात नागरिक, लहान मुले, हॉटेल्स तसेच शासकीय कार्यालयांमध्ये जारच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.मात्र या पाण्याची शुद्धता, टीडीएस, बॅक्टेरिया आणि केमिकल लेव्हलची नियमित तपासणी होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जलजन्य आजाराचा धोका
दूषित व निकृष्ट दर्जाच्या पाण्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, डायरिया यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.त्यामुळे प्रत्येक पाणी विक्रेत्याच्या पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी तसेच दोषी आढळणाऱ्या प्लांटधारकांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांचे व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
