अ.नगर – येथील डॉ. कांकरियांचे साईबन कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन-वृक्षदिंडी या त्रिसुत्री अभियानाचा शुभारंभ अहिल्यानगर महापालिककेचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला अशी माहिती साईबनच्या संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश कांकरिया हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीन सिटी मोहिम – ग्रीन आर्मी कमिटीचे हर्षल आगळे हे होते. समवेत रोटरी क्लब ऑफ अ.नगरचे अध्यक्ष सुभाष गर्जे, सचिव आदिनाथ ठोंबे, डॉ. दादासाहेब करंजुले, सुहास क्षीरसागर, सौ नयना गर्जे, सौ स्नेहल क्षीरसागर हे उपस्थित होते.
उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, पर्यावरणाचे संतुलन राहण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. त्यासोबतच वृक्षांची जोपासना अर्थात वृक्षसंवर्धन व्हायला हवे. फक्त झाडे लावा नव्हे तर त्या सोबत झाडांना जगविणेही आवश्यक आहे. वृक्षदिंडीच्या माध्यमातुन बाल वयातच मुलांवर वृक्षसंस्कार होतात. त्यामुळे हा त्रिसुत्री कार्यक्रम राबवुन साईबन परिवार हा नगरच्या हिरव्या वैभवात भर घालत आहे. सांडपाण्यावर पडिक जमिनीचा विकास करून साईबन हे नंदनवन फुलविण्याचे श्रेय हे डॉ.सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया या दाम्पतयाकडे जाते. साईबन मध्ये मोठया प्रमाणात शालेय सहली येतात त्यांच्यावर वृक्षसंस्कार करण्याचे मौलिक कार्य इथे होतांना दिसते. ही समाधानाची बाब आहे पालकमंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिम-ग्रीन आर्मी कमिटी योजना जाहिर झाल्यानंतर पहिला फोन साईबन कडून आला व ते या अभियानामध्ये सहभागी झाले याचा आनंद वाटतो. हर्षल आगळे यांनी साईबनचे कौतुक करून अभियानाला शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. साईबनमध्ये आम्ही हजारो झाडे लावली व ती जगवली आहे. साईबनला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त झाला आहेत.
सदर प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाचे पुजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आले. श्री सुभाष गर्जे यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे समर्पक गीत सादर करून रोटरी परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

- साईबन मध्ये आलेले 150 विद्यार्थी तसेच साईबनचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, रोटरी परिवार वृक्षदिंडीमध्ये सहभागी झाले. त्यात नौजवान भारत सभा अ.नगर संस्थेचे विद्यार्थी अग्रभागी होते. वृक्षदिंडीचे उद्घाटन 10 वर्षांची चि. शुरा क्षीरसागर हिच्या हस्ते करण्यात आले. पुढे वृक्षपालखी व त्यामागे विद्यार्थी हातामध्ये पर्यावरण संवर्धनाचे फलक घेऊन वृक्षदिंडी मध्ये दिमाखाने चालत होते. झाडे लावा, झाडे जगवा, पेड लगाओ-देश बचाओ, पर्यावरणाचे संवर्धन करूया, देशाला समृध्द करू या घोषणाने साईबनचा परिसर दुमदुमला गेला होता. वृक्षदिंडीची सांगता वृक्ष प्रतिज्ञेने झाली. साईबनच्या संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी ‘मी वृक्षतोड करणार नाही, करू देणार नाही, मी एक तरी झाड लावेल व त्याला जगवेल’ अशी प्रतिज्ञा उपस्थितांकडून करून घेतली. शेवटी रोटरीचे सचिव आदिनाथ ठोंबे यांनी आभार मानले. सदर प्रसंगी नौजवान भारत सभा अ.नगर चे अतुल महारनवर, अविनाश साठे यांचा सत्कार करण्यात आला.
मा.संपादक साहेब,
स.न.वि.वि. कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकातुन प्रसिद्धी दयावी ही विनंती.
डॉ. सुधा कांकरिया
