यावल तालुक्यातील नायगाव येथे शेतकऱ्याच्या संसाराचा भार आपल्या खांद्यावर घेऊन ऊन-पाऊस, चिखलाची पर्वा न करता वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र सण म्हणजे बैलपोळा. ज्यांच्या घामाने शेतात पीक डोलते आणि ज्यांच्या श्रमांवर शेतकरी कुटुंबाचा संसार फुलतो, त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत नायगाव येथे बैलपोळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
नायगाव येथील शेतकरी कुटुंबातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार तसेच सहपरिवाराच्या वतीने बैलपोळ्यानिमित्त बैलांची पारंपरिक पद्धतीने सजावट करून त्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी बैलराजाला नैवेद्य अर्पण करून शेतकरी जीवनातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
“ज्यांच्या कष्टांमुळे आपल्या शेतात हिरवाई आणि आपल्या घरात समृद्धी येते, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणे हाच खरा संस्कार आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी गुलाबराव तुकाराम पवार, राजेंद्र रघुनाथ पवार, श्रावण पवार, शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशनच्या सचिव वैशाली पवार, हिम्मत पाटील, वैभव चौधरी, संजय बारेला, राघवेंद्र पवार यांच्यासह नायगाव परिसरातील स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक वेशभूषा, सजवलेले बैल आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे नायगावात बैलपोळ्याचा उत्साह पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *