मी गुलाबी स्वप्न दाखवत नाही आणि उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही. अजित दादाचा वादा आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे,असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आज निफाड येथे झालेल्या सभेतून अजित पवार बोलत होते. गुरुवारपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा नाशिकमधून सुरु झाली आहे. आज त्यांची ही जनसन्मान यात्रा निफाडमध्ये पोहोचली.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आज नागपंचमीचा सण आहे. नागांची आपण पूजा करतो. महिला झोका खेळतात, ही आपली संस्कृती आहे. आज भर पावसात सर्वजण स्वागत करत आहेत. फुलांची उधळण करत आहेत. आम्ही चांगली योजना आणली आहे. ती पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलाय. त्यासाठी मित्र पक्षांचे सहकार्य लाभले. योजना पूर्ण करण्यासाठी घेतली असून आम्ही कुठल्याही योजना अभ्यास केल्याशिवाय आणत नाही. महिलांना ५०टक्के आरक्षण दिले. त्यांना सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही,असे त्यांनी म्हटले आहे.
लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार म्हणाले की, महिला आपल्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी काम करतात. त्यांना काही आशा असतात. मी १०वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. काल रात्री एक बैठक घेतली. सव्वा ते दीड कोटी महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. अजूनही काही नोंदणीचे काम सुरू आहेत. यात अडचणी येत आहेत, मात्र आम्ही त्यातून मार्ग काढत आहोत.

१७ तारखेला सहा हजार कोटींच्या फाईलवर सही केली आणि काल नाशिकला आलो. आम्हाला लॉन्ग टर्म राजकारण करायचे आहे. औट घटकेचे नाही. उद्या लाभ मिळाला नाही तर महिला मला जाब विचारतील. कोणी खोटा नेरेटिव्ह सेट केला तर त्याला बळी पडू नका, ही कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी योजना आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांची योजना आहे. ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटन दाबले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
अजित पवार पुढे म्हणाले की,आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, त्यानंतर सरकार पडले, कसे पडले सर्वांना माहिती आहे. आम्ही किती दिवस सांगायचे सत्तेत नाही, सत्तेत आलो म्हणून विकास कामासाठी निधी देता आला. मी कोणाला दुखवण्यासाठी निर्णय घेतला नाही मी कामासाठी आलो आहे. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत. हवेत गप्पा मारणारी नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेमध्ये जो झटका दिला, तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो. कांदा निर्यात बंदी करायची नाही. वीज बिल माफ करा, असे निर्णय आता घेतले आहेत.
