संगमनेर : यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ व संगमनेर मध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या जातीयवादी शक्ती विरोधात तमाम संगमनेरकर हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, अध्यात्मिक मंच, महाविकास आघाडी यांच्या वतीने गुरुवारी (ता.२१) सकाळी ९ वाजता विराट मोर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्वाभिमानी संगमनेर तालुका यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका उभा केला आहे. एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्यामध्ये संगमनेरने दिली आहे. सर्वधर्मसमभाव व वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व आहे. धर्माच्या नावाखाली काही तथाकथित कीर्तनकारांनी राजकीय अजेंडा सुरू केला असून बापू भंडारे या व्यक्तीने माजी मंत्री थोरात यांना मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर संपूर्ण संगमनेर तालुका सह राज्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटले असून तालुक्यातील गावागावांमधील नागरिक सकाळी संगमनेर मध्ये जमा झाले. संगमनेर तालुका हा स्वातंत्र्यसैनिकांचा आणि संघर्षाचा तालुका आहे. शांतता व संयम ही आपली संस्कृती असून जर कोणी आमच्या शांततेवर आघात करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा अनेक युवक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यामध्ये सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदाय, युवक मंडळे, गणेश मंडळे, संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी मंडळ, अध्यात्मिक मंच, वारकरी सेवा संघ, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्ष ,मार्क्सवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, यांच्यासह साहित्य मंच, विविध महिला संघटना, पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना, यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून अशा विघातक शक्तीविरोधात एकजुटीने लढण्यासाठी गुरुवारी सकाळी ९ वाजता यशोधन कार्यालय ते संगमनेर बसस्थानक असे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.
N Tv News Marathi🎥📷 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा : 9028903896