वाशिम : पुर्वापार चालत आलेल्या जाती व रुढी परंपरांमध्ये संपूर्ण बहुजन समाज गुरफटलेला आहे. जातीत विभागल्यामुळे त्यांच्यात एकजूट नाही. त्यांच्या धर्माने कर्माचा सिद्धांत दिल्यामुळे आपल्या प्रगतीसाठी तो धडपड करत नाही. धर्माच्या चौकटीतच तो वावरतो. धर्माभिमानामुळे तो शिक्षणापासून दूर जात आहे. त्यामुळे बहुजनांची प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. तथापि, बहुजनांची प्रगती होण्यासाठी जातीअंत हाच एकमेव पर्याय आहे. असा सूर एकदिवसीय कार्यशाळेतील चर्चासत्रातून उमटला.

वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन सेवांकुर दिव्यांग निवासस्थानी दि. 5 डिसेंबर रोजी शंभुराजे व्हॉट्सॲप ग्रुपच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ‘आपल्या संविधानिक न्याय हक्कांसाठी बहुजन समाज पेटून का उठत नाही’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉ.रवी जाधव यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष सतीश जामोदकर, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भरत आव्हाळे, सत्यशोधक समाजाचे विभागीय सचिव प्रल्‍हाद पौळकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंजुश्री जांभरुणकर, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर आदी उपस्थित होते.यावेळी उद्घाटन सत्रात विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यानंतर पार पडलेल्या चर्चासत्रात ‘आपल्या संविधानिक न्याय हक्कांसाठी बहुजन समाज पेटून का उठत नाही’ या विषयावरील चर्चेत बामसेफचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संघरक्षित भदरगे, सत्यशोधक विचारवंत गजानन देशमुख, रामराम सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. मंगेश भुताडे, सत्यशोधक समाजाच्या जिल्हा प्रवक्ता ऍड. दिपालीताई शृंगारे आदींनी विश्लेषकांची भूमिका निभावली. यावेळी उपस्थित शंभुराजे ग्रुपच्या सदस्यांनी चर्चेतील विषयावर रोखठोक मते मांडली. सदस्यांनी मांडलेल्या मतांची नोंद घेऊन त्यावर विश्लेषकांनी भाष्य केले. यावेळी समोर आलेल्या मुद्द्यांमध्ये, बहुजन समाज हा हजारो जातीत विभागला आहे. त्यामुळे तो आपल्या संविधानिक हक्कांसाठी एकत्र येत नाही. तो शिक्षणाला जास्त महत्त्व देत नसल्यामुळे आपल्या अधिकारांची त्याला जाणीव नाही. बहुजन समाजात अनेक संघटना आहेत. मात्र, त्या एकत्र येऊन लढत नाहीत. शिक्षण व रोजगाराचा अभाव असल्याने त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. म्हणून तो जगण्यासाठीच संघर्ष करतो. आणि हक्कांसाठी लढत नाही. खाजगीकरण , भांडवलीकरणामुळे बहुजनांच्या प्रगतीच्या वाटा बंद होत आहेत. अशा विविध मुद्यांवर ही चर्चा रंगली. यावेळी शंभुराजे ग्रुप मधील सदस्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. यानंतर चेतन सेवांकुर आर्केस्ट्राच्या कलावंतांनी बहारदार संगीतमय कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंभूराजे व्हाट्सअप ग्रुपचे ऍडमिन गजानन धामणे यांनी केले. संपूर्ण कार्यशाळेचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार गजानन खंदारे यांनी केले. या कार्यशाळेसाठी रायगड सहल ग्रुपचे सदस्य, चेतन सेवांकुरचे संचालक पांडुरंग उचितकर यांच्यासह प्रदीप उचितकर, अजय सोनूनकर, नागो शिंदे, शेख इसाक, मयूर धामणे, प्रबळ पौळकर, पांडुरंग सरनाईक आदींनी परिश्रम घेतले. एका व्हाट्स अँप ग्रुपने घेतलेल्या या वैचारिक कार्यक्रमाची सर्वत्र स्तुती केली जात आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *