- पोळा सणावर दुष्काळाचे सावट
- ज्वारीऐवजी मका पिकाचा वापर
- गेल्या दीड महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा
- हिरव्या चाऱ्याचा तुटवडा जाणवू लागला
- खरिपातील सर्वच पिके धोक्यात
- विहिरीच्या पाण्यावर पिके वाचवण्याची धडपड
JALGAON | यावल तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पोळा सणावरही दुष्काळाचे सावट पसरले असून, ज्वारीऐवजी मका पिकावर बैलांचा उपवास सुटणार आहे.
पावसाची कमतरता असल्याने गवताचीही कमतरता निर्माण झाली आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे खान महिन्याच्या दिवशी, शेतकरी मोठ्या प्रमाणात गवत आणि ज्वारीचे पीक कापून बैलांसाठी चारा आणत होते. मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी असून, ज्वारीऐवजी चक्क मका पिकाचा वापर केला जात आहे.
हिरव्या चाऱ्याचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकरी उपलब्ध होईल तो चारा आणत आहेत. उडीद, मूग, चवळी यासोबतच मका, सोयाबीन, कुळीद आणि कपाशी ही सर्व खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. ज्यांच्याकडे पीक वाचवण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी विहिरीच्या पाण्यावर पिके वाचवण्याची धडपड करत आहेत.
महागडी बियाणे, महागडी मजुरी आणि वाढते परिश्रम यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. दरम्यान, पोळा सणानिमित्त गावात नारळ फोडण्याची पारंपरिक प्रथा आहे. बारा वाजल्यानंतर प्रमुख चौकात नारळाचे तोरण बांधून शेतकरी बैलांच्या सहाय्याने नारळ फोडण्याचा कार्यक्रम पार पाडतात.
एनटीव्ही न्यूज मराठी | यावल
