बुलढाणा : जमिनीच्या माध्यमातून प्रतिष्ठा प्राप्त होते. शासनाच्या कामी न येणाऱ्या पडिक किंवा गायरान जमिनीवर भूमिहीन गोरगरीब स्वाभिमानाने उदरनिर्वाह करित असेल कायं हरकत आहे. त्यामुळे राज्यसरकारने भूमिहीनांना अतिक्रमणीत जमिनी कायमस्वरूपी देवून प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली पाहिजे असे प्रतिपादन पिरिपाचे संस्थापक प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केले.

येथील विश्रामगृहात आज शनिवारी प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत उपरोक्त प्रतिपादन केले. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला भाजपाने ईडीसह विविध चौकशांच्या माध्यमातून जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील राज्यसरकार पाच वर्षी टिकेल असे सांगून सत्तेत सहभागी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकापूर्वी आम्हाला सोबत ठेवले मात्र सत्ता आल्यानंतर मित्रपक्ष म्हणून सन्मानपूर्ण वागणूक दिली नाही अशी खंत व्यक्त केली.
देशातील सरकार संविधानाचा अजेंडा जाणीवपूर्वक दूर ठेवून रा.स्व.संघाच्या विघटनवादी अजेंड्यावर चालत आहे.संविधानावर चालले असते तर देश सुजलाम सुफलाम झाला असता.खर तर कुठलाही पक्ष असो त्यांनी जात,धर्म यापेक्षा देशाला आधी महत्त्व दिले पाहिजे. असे प्रा.कवाडे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्यासमवेत पिरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे,पिरिपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे,जिल्हा उपाध्यक्ष गजानन तायडे, शेख निसार ,मंगेश भोटकर आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बुलडाण्यात भूमिहीन शेतमजूर हक्क परिषद..!
राज्यात सर्वदूर भुमिहिनांचा अतिक्रमणीत जमिनीचा प्रश्न आहे. त्यांना हक्काची जमीन मिळाली पाहिजे त्या धरतीवर बुलढाणा जिल्ह्यात अमरावती विभागीय भुमिहिन शेतमजूर हक्क परिषद कोरोना महामारी आटोक्यात आल्यानंतर घेण्यात येईल. त्या माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याची भुमिका घेतली जाईल अशी माहिती प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.