औरंगाबादः शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढू लागल्याने महिनाभरापूर्वी सुरु झालेल्या शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागला होता. मात्र आता कोरोना बाधितांचे प्रमाण कमी दिसून येत असल्याने शहरातील शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याच प्रक्रियेत सोमवारपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत, अशी परवानगी महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. या वर्गातील 15 ते 18 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना उपस्थितीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेणे आवश्यक आहे, अशी अटही महापालिकेच्या वतीने घालण्यात आली आहे.

दहावी-बारावीचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरु
दरम्यान, शहरातील दहावी आणि बारावीचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी या वर्गांना अनुक्रमे 25 आणि 15 टक्के उपस्थिती होती. 26 जानेवारीनंतर गेल्या दोन दिवसात उपस्थिती वाढण्यास सुरुवात झाली असून सध्या शाळा, महाविद्यालयांमध्ये सराव परीक्षांच्या तयारीची लगबग सुरु आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता काहीशी ओसरल्याचे चित्र असल्यामुळे येत्या आठवड्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.

जिल्हा परिषदेच्या टास्क फोर्सने ग्रामीण भागात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास 24 जानेवारीला परवानगी दिली होती. त्यानुसार, ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र हिवाळ्यामुळे जिल्हाभरात थंडीची तीव्र लाट सुरु असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी जाणवत आहे