हिंगोली : जिल्ह्यातील सिंचन अनुशेष अंतर्गत पूर्णा नदीवर पूर्वीपासूनच प्रस्तावित असलेल्या पोटा , जोडपरळी आणि पिंपळगाव कुटे तीन उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये गोदावरी खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नसल्याने तीन बंधाऱ्याचे कामं प्रलंबित होते. त्यामुळे या बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी सन २०१९ म्हणजेच राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊनही केली होती . सातत्यपूर्ण केलेल्या अथक प्रयत्नानंतर या बंधाऱ्याच्या प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा झाला असून त्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यास लवकरच मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पाच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
पूर्णा खोऱ्यातील सिद्धेश्वर धरणाखालील पूर्णा नदीवर ३ उच्च पातळी बंधाऱ्यांना यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार गोदावरी खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करून खासदार हेमंत पाटील यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही राज्य सरकारकडे करून सातत्याने पाठपुरावा केला होता . त्यानंतर या बंधाऱ्यासाठी पाणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मार्ग मोकळा झाला . या सर्व प्रक्रियेच्या पहिल्या टप्यात या बंधाऱ्याच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यात आल्यानंतर सल्लगार समितीकडून प्रशासकीय मान्यता मिळणार आहे . पूर्णा नदीवर पोटा येथे असलेल्या उच्च पातळी बंधाऱ्याची साठवण क्षमता ९.५७ दलघमी असून या बंधाऱ्यातून १७३६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . जोडपरळी उच्च पातळी बंधाऱ्याची साठवण क्षमता ९.७५ दलघमी आहे. या बंधाऱ्यामुळे १७३२ हेक्टर वरील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे तर पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधाऱ्याची साठवण क्षमता ८. ९४ दलघमी असून यामुळे जवळपास १६३४ एवढे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे .
या तिन्ही बंधाऱ्यात ३७ दलघमी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती. त्यानुसार सध्या त्यामध्ये २८. २६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे या पाण्यामुळे वसमत तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील तब्बल ५ हजार १०२ हेक्टर क्षेत्र सिंचानाखाली येणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक प्रश्न खासदार हेमंत पाटील यांनी केंद्र आणि राज्यस्तरावर मार्गी लावून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे .त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच वसमत तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे हळद संशोधन केंद्र मंजूर करून त्यासाठी १०० कोटीच्या भरीव निधीची तरतूद केली आहे आणि त्यानंतर आता पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा टक्का नक्कीच वाढणार यात दुमत नाही.