पुणे : आपल्या मैत्रीची यादगार आठवण राहावी त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाचा भाग व येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा व हिरवळ अनुभवता यावी याकरिता तब्बल २९ वर्षानी गेट टू गेदरचा निमित्ताने एकत्रित आलेल्या शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या सन १९९३ च्या इयत्ता १० वी तुकडीतील विद्यार्थ्यांनी ५० झाडे शहरातील डोंगरावर लावून पर्यावरण संवर्धनाचा जागर केला.
शिरुर शहरातील देवराई सह्याद्रीच्या वतीने पुणे- नगर रस्त्यानजिक असलेल्या डोंगरावर वनखात्याच्या डोंगरावर झाडांचे विशेषत फळझाडांचे बन उभे राहात आहे याठिकाणी विद्याधाम प्रशालेच्या सन १९९३ च्या दहावीच्या तुकडीतील विद्यार्थ्यानी ५० फळझाडे याठिकाणी लावून पर्यावरण संवर्धनाचा जागर केला. सन १९९३ मधील १० वीतील विद्यार्थी ,प्रा.सतिश धुमाळ यांनी ही माहिती दिली.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांची शिवतारा कृषि पर्यटन केंद्रावर शाळा भरली . सर्वांचे औक्षण करुन व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले . सकाळी ११ वाजता शाळेची घंटा वाजली त्यानंतर सर्व मित्र मैत्रीण यांनी शाळेची प्रार्थना व राष्ट्रगीत म्हटले. प्रशालेत नित्यनेमाने सांगण्यात येणाऱ्या दिनविशेषही सांगण्यात आला . या बॅचचे माजी विद्यार्थी व एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले ..त्यानंतर पुन्हा नव्याने प्रत्येकाने आपली ओळख करुन दिली. ओळख करुन दिली की दहावीतील तो किंवा ती याच्यात किती फरक पडला अशी चर्चा झडत होती .त्याचबरोबर ओळखी नंतर दहावीतील टोपणनावाने काहींनी हाक मारली . मुल ते प्रौढ असा आपल्या प्रवास कसा पटकन झाला याचे चित्र सर्वांच्या मनपटलावर उमटत होते .
याप्रसंगी प्रास्ताविक विनय संघवी सुत्रसंचालन विद्या सोळसे , स्वाती थोरात यांनी केले आभार सतिश धुमाळ यांनी मानले .
कार्यक्रमस्थळी शाळा व शाळेत शिकविल्या जाणाऱ्या विषयांच्या पुस्तकांची चित्रे उपक्रमांची चित्रे यांचा असणारा फलक लक्ष वेधून घेत होता त्याचबरोबर सन १९९० ते १९९५ या वर्षांमधील प्रसिद्ध हिंदी व मराठी चित्रपट गीते लावण्यात आल्याने सर्व जण आपल्या त्या काळातील आठवणीत हरखून गेले . प्रशालेत असणारे प्रशाला गीताचे सामूहिक गाण यावेळी करण्यात आले. या गीतात ‘ जगात जावू कोठे जरी ही गर्जत ठेवू विद्याधाम ‘ ही ओळ आल्या नंतर अतिशय अभिमानाने व खड्या आवाजात या ओळी सर्वानी म्हटल्या. त्याच वेळी आपण विद्याधाम प्रशालेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान व कृतार्थता प्रत्येकाच्या चेह-यावर झळकत होता.

विविध गुणदर्शन सत्राच्या कार्यक्रमात अनेकांनी आपली कला सादर केली . अमित घावटे ,अनिता भोगावडे , ॲड श्रीरंग कडवेकर , माजी सरपंच वर्षा काळे , डॉ धीरज सुराणा , परेश बोरा , निलेश लटांबळे , अजित मोरे , सुजाता नरवडे गोरक्षनाथ निघुल , तुषार दळवी ॲड वीरेंद्र सावंत यांनी मनोगते व्यक्त केली .
त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यानी हम होंगे कामयाब हे समूहगीत सामूहिकपणे म्हटले.त्याने वातावरणाचा माहौल अधिकच चैतन्यमय व उत्साही झाला सर्वाना या गेट टू गेदरची आठवण म्हणून विद्याधाम प्रशाला ९३ असा उल्लेख असणारा बिल्ला , आकर्षक टोपी , ग्रुप फोटो , कार्यालयीन बॅग व मिठाई बॉक्स , सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली . गेट टु गेदरच्या निमित्ताने झालेल्या मित्रांशी संवाद व सहवास याची उर्जा जीवनात येणाऱ्या अनेक संकटाना तोंड देताना टॉनिक सारखी शक्तीवर्धक ठरते.
अशी ही उर्जा दरवर्षी गेट टू गेदरच्या रुपाने घ्यायची व दरवर्षी पुन्हा नक्की भेटायचं असे वचन देत सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला असे प्रा.सतिश धुमाळ यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश धुमाळ, परेश बोरा , अतुल बोथरा , स्वाती थोरात , विद्या वाघमारे , वर्षा काळे , विनय संघवी , प्रशांत थोरात चंद्रकांत कनिंगध्वज ,सचिन घोडके ,विनोद बोथरा ,गणेश खोले ,मध्यकांत पानसरे ,मुकेश संघवी या १९९३ मधील १० वीतील विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला .