अहमदनगर : नगर जिल्ह्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपत्तीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १७ ते २० ऑगस्टपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा.
