सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, तरीही अद्याप पाऊस झालेला नाही. अशातच माढा तालुक्यातील तुळशी गावातील ग्रामस्थांनी गावातील गणपतीसमोर रिकाम्या घागरींची आरास करून बाप्पालाच पाण्यासाठी साकडे घातले आहे.
गावाला पाण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून पाणी उपलब्ध करून दिले जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. निदान पाऊस पडून तरी गावाला पाणी मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
तुळशी गावातील नागरिकांना आजही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी गावाला मिळावे, या मागणीसाठी गावातील १२ ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.
अशातच गणपतीसमोर रिकाम्या घागरींची आरास करून तुळशी ग्रामस्थांनी गावातील दुष्काळाची दाहकता अधोरेखित केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पाण्याअभावी गावातील मुलांची लग्नं होत नसल्याची व्यथा तरुणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गावाला तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
