अनधिकृत वीज जोडणी प्रकरणावरून लाईनमनला काठीने मारहाण
फुलचंद भगत
वाशिम:-महाविकास आघाडी शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या विद्युत महावितरण कंपनीला वीज देयक भरणा न करणारे ग्राहक, वीज चोरी, अनधिकृतपणे जोडलेल्या वीज जोडणीवर कारवाई करुन दंड वसुली करण्याचे आदेश शासनाने दिल्याने आजपावेतो मावळ भूमिका घेणाऱ्या विद्युत महावितरण कंपनीने मात्र; आजरोजी घरगुती अथवा कृषिपंपावर कारवाईचा बडगा उगारल्याने शेतकी पंपाची अवैधरित्या जोडलेल्या लाईनवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या लाइनमनला अमानुष मारहाण करुन जखमी केल्याची घटना कारंजा तालुक्यातील ग्राम हिंगणवाडी येथे दि. 06 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी, धनज पोलीस प्रशासन कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने विद्युत महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता.

सविस्तर वृत्तानुसार, धनज उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राहटी, हिंगणवाडी, अंबोडा या गावाच्या विद्युत वाहिनीच्या देखभालीची जबाबदारी अभिजित शेगोकार यांच्यावर आहे. त्या अनुषंगाने दि. 06 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार वीज देयक न भरलेल्या ग्राहकांचा कट केलेला पॉइंट बघण्यासाठी शिवाय, वसुलीसाठी कर्मचारी अभिजित शेगोकार व कर्मचारी सचिन भगत ग्राम हिंगणवाडी येथे गेले असता, श्रीकृष्ण शेलोकार यांच्या घरासमोरील रोहित्रावरील कट केलेली कृषिपंपाची वीज पुन्हा जोडलेली आढळून आली. याचा तपशील घेत असतांनाच याठिकाणी, काहींनी येऊन अरेरावी शिवीगाळ करुन संगनमताने काठीने अमानुष मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समजते. शिवाय, शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. सदरहू, व्यक्तीने 11 के.व्ही. वाहिनी अनधिकृतपणे जोडली असून, याबाबत वारंवार तोंडी सूचना देऊन सुद्धा अरेरावी करुन नेहमी शासकीय कामात अडथळा निर्माण करतात. याप्रकरणी, महावितरण कर्मचारी अभिजित शेगोकार यांनी धनज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली कसून घटनेचा पुढील तपास धनज पो.स्टे. पोहेकॉ भारत रामटेके हे करीत आहे.
खाकीच खाकीचा वैरी?
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणाची तक्रार धनज पोलीस स्टेशन येथे गेलेल्या कर्मचाऱ्यांची संबंधित पोलिसांनी हेळसांड करुन सुरुवातीला तक्रार नोंदविन्यासाठी टाळाटाळ केली असल्याची चर्चा आहे. अखेर सदरहू, प्रकरण तपासामध्ये ठेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब करीत असल्याने खाकीच खाकीचा वैरी असल्याची चर्चा महावितरण कर्मचारी व्यक्त करीत आहे.
आदेश शासनाचा छळ कर्मचाऱ्यांचा; जीवित्वाची जबाबदारी कोणाकडे
ऐन शेतकी हंगामाच्या वेळी वीज देयक न भरणा करणारे, वीज चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या रोहित्राची वीज कट करण्याचे स्पष्ट आदेश देऊन वसुलीवर जोर देण्यासाठी शासनाने महावितरणला भाग पाडले असतांना या वसुलीच्या सक्त आदेशाला आपले कर्तव्य मानून फील्ड वर्क करणारे लाईनमन आपले कर्तव्य करतांना हयगय करीत नाही आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या रोषाला सुद्धा या कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत असतांना त्यांना शिवीगाळ, मारहाण या प्रकाराला आपले कर्तव्य बजावतांना सामोरे जावे लागत असल्याने ‘आदेश शासनाचा छळ आमचा, आमच्या जीवित्वाची जबाबदारी कोणाकडे? असा, प्रश्न प्रखरपणे महावितरण कर्मचारी मांडत असल्याचे दिसून पडत आहे.