नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. ११ (जिमाका) : जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी “काय करावे” आणि “काय करू नये” याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
काय करावे :
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे.
उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी यांसारख्या घरगुती शीतपेयांचे सेवन करावे. तसेच पशुधनाला सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे.
काय करु नये :
याचबरोबर प्रशासनाने काही गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. त्यानुसार दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे.
उष्माघात झालेल्या व्यक्तींची काळजी घेताना त्यांना त्वरित थंड जागी हलवावे आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. ओल्या कपड्याने अंग पुसून थंड करावे तसेच ओआरएस, लस्सी, ताक किंवा लिंबूपाणी द्यावे. बाधित व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
