रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे अतिरिक्त एमआयडीसी परिसरात कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला. या सांडपाण्यामुळे शेती आणि पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील नाले तसेच चार ते पाच हजार लोकवस्तीच्या पिण्याच्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांना धोका निर्माण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. कंपनीकडून वारंवार अशा प्रकारे दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याचा आरोप करत नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
याबाबत एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सांडपाणी सोडण्याचा प्रकार तातडीने थांबवला नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
