उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी हेक्टरी दोन लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने वाळलेले सोयाबीन प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अत्यल्प व अनियमित पाऊस, पावसातील मोठे खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे उमरखेड तालुक्यात शेती व शेतकरी संकटात सापडल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तालुका कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करून नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली.
ऊस आणि हळद उत्पादकांनाही हेक्टरी दोन लाख रुपयांची विशेष मदत, तसेच गतवर्षीचा पीकविमा तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर इसापूर धरणातून तातडीने पाणी सोडण्याची मागणीही करण्यात आली.
हे निवेदन उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विधानसभा प्रभारी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, अरविंद वाढोणकर, संजय मोघे, महेंद्र कावळे, तातू देशमुख, नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे, गोपाल अग्रवाल, ख्वाजाभाई कुरेशी, बाळासाहेब चंद्रे, गणेश बेले, धोंडबा माने, उत्तम पांडे, अनिल कदम, गजानन भारती, कैलास राऊत, तात्या चव्हाण, गजानन मिटकरे, अमोल तुपेकर, जाहीर काजी, हमीद काजी आणि युवराज जाधव यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
