
दिनांक २५ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे रमाई फाऊंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने रमाई मासिक बारावा वर्धापण दिन घेण्यात आला
फुले-आंबेडकरी चळवळीमध्ये वृत्तपत्रांचे महत्वाचे योगदान राहिले आहे परंतु अनेक ज्या पत्र ताकदीने निर्माण होतात त्याच ताकदीने बंद पडतात. त्यामुळे अनेकदा चळवळीचा विचार समाजापर्यंत पोहोचत नाही. म्हणून चळवळीची माध्यमे टिकवणे हे सर्वात मोठे आवाहन असतांना रमाई सारखे मासिक १२ वर्ष अविरत चालविल्या जात असल्याचे कौतुक वाटते, असे गौरवोद्गागार महाराष्ट्र राज्याचे उद्योग संचालनालय विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.
दिनांक २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन, भारतीय स्त्री मुक्ती दिन) रोजी रमाई फाउंडेशन संचलित रमाई मासिकाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमातून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा लोखंडे या होत्या विचारमंचावर पु.भदंत विशुद्धानंदबोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, रमाई मासिकाच्या संपादक प्रा. डॉ. रेखा मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पु.भदंत विशुद्धानंदबोधी महाथेरो यांच्या याचनेद्वारे सामूहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. हर्षदीप कांबळे पुढे बोलताना म्हणाले की, स्त्री-पुरुष समानतेचे स्वप्न बाबासाहेबानी पाहिले होते. संविधानामध्ये त्याची नोंद त्यांनी केले आहे. परंतु स्त्रीमुक्ती केवळ बोलल्याने होणार नाही तर विचारातून, आचारातून परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे. महिलांनी उद्योगक्षेत्रात पुढाकार घेतला पाहिजे. तो ख-या अर्थाने स्त्री मुक्तीचा मार्ग आहे. असेही डॉ. कांबळे यावेळी म्हणाले.
डॉ. चेतना सोनकांबळे बोलतांना म्हणाल्या की, रमाई मासिक हे चळवळीची मांडणी करणारे मासिक आहे. या मासिकाची अकॅडमीक पातळीवर सुरुवात करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाई मासिकाच्या कार्यकारी संपादक दैवशीला गवंदे यांनी केले तर आभार ललिता खडसे यांनी मानले.
यावेळी फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद