लातुर : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदीच्या पात्राला घाणीने वेढले असल्याने नदीतील पाण्याची स्वच्छता गायब झाली आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.तिरू नदी ही हाळी हंडरगुळी गावासह परिसरातील गावांसाठी वरदान मानली जाते. या नदीचा उगम हेर परिसरात असल्याचे सांगितले जाते. ही नदी पुढे शेळगाव, वडगाव, हाळी हंडरगुळी परिसरातून वाहत जाऊन तिरू प्रकल्पास मिळते. या नदीवर जागोजागी बंधारे उभारल्याने पाण्याचा शेतीसाठी उपयोग होत आहे.

हाळी हंडरगुळी गावाजवळून ही नदी वाहते. पण या नदीवरील पुलाशेजारी घाण, कचरा, कोंबड्यांची पिसे, मृत प्राणी, कॅरीबॅग्ज टाकली जात आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय पावसाळ्यात ही घाण पाण्यात जाऊन मिळते. तिरू प्रकल्प भरल्याने नदीपात्रात पाणी थांबले आहे. त्यामुळे या पाण्याचा घाण वास येत असल्याचे बोलले जात आहे. अगोदरच नदीपात्राला झाडाझुडपाचा विळखा बसला आहे. अशातच नदीशेजारी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले असुन यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.दोन्ही गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढाकारातून या घानीची योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी हाळी हंडरगुळी येथील नागरिकांतुन होत आहे नांदेड-बीदर राज्यमार्गावर तिरू नदीवर पूल आहे. या पुलावरून वाहतूक नेहमी वर्दळ असते. पण या ठिकाणी आल्यानंतर दुर्गंधीचा भपकारा जाणवतो. शिवाय कोंबड्यांची पंख व मृत्य प्राण्यांचे अवशेष यांच्या वासामुळे कुत्र्यांची ये-जा वाढल्याने अपघात होत आहेत
लक्ष्मीकांत मोरे
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातुर
एन.टिव्ही.न्युज मराठी
दि.१२/०१/२०२२