आ धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना निर्देश,एटापल्लीत आढावा सभा
गडचिरोली : राज्यातील महा विकास आघाडीतर्फे विविध योजना राबविली जात आहेत. त्यासाठी पाहिजे ती निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक योजना शेवटच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने करा.असे निर्देश अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. एटापल्ली तालुक्यातील गट साधन केंद्राच्या सभागृहात आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच तालुक्यातील विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आढावा सभेत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, जि प सदस्य ज्ञान कुमारी कौशी, पंचायत समितीचे सभापती बबीता मडावी, उपसभापती जनार्दन नल्लावर, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी डॉ ज्ञानेश्वर गहाने, माजी पंचायत समिती सभापती बेबी लेकामी,सपना कोडापे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या एटापल्ली तालुका अध्यक्ष ललिता मडावी, शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार,सरपंच राजू नरोटे, सरपंच रीना मडावी,सरपंच वासुदेव गेडाम,सरपंच तुळशीराम मडावी,सरपंच पूनम लेकामी तसेच विविध विभागाचे प्रमुख तथा राकाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तालुक्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीकोनातून सर्वच विभागांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भाग आहे. शासकीय कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कुठलेही त्रास होणार नाही याची काळजी घ्या असेही त्यांनी निर्देश दिले.आढावा सभेत विविध विभागांच्या प्रमुखाकडून विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील काही समस्या प्रलंबित असल्याचे निदर्शनास येताच ती समस्या त्वरित सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.