औरंगाबाद : तिसगाव म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांना नवीन घर बांधकामासाठी सेनादल विभागाकडून परवानगी देण्यास आडकाठी घालण्यात येत आहे. त्यामुळे बांधकामे खोळंबली असून नागरिकांना मोठया समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दिवसेंदिवस कुटुंबातील सदस्य संख्या वाढत असून घर मात्र अपुरं पडत आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मिलिट्री प्रशासनाशी संपर्क साधून नागरिकांना बांधकामाला परवानगी द्यावी, यासाठी उपसरपंच तथा शिवसेना विभाग प्रमुख नागेश कुठारे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.

यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या कुटुंबातील संख्याही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना जुनी घरे पाडून सिडको प्रशासनाच्या नियमानुसार नवीन घरे बांधायचे आहे.मात्र नवीन बांधकामाला मिलिट्री प्रशासनाने आडकाठीचे धोरण अवलंबले आहे. सिडको प्रशासनाला मिलिट्री एरियापासून १०० मीटरच्या आत बांधकाम परवानगी देऊ नये असे पत्र पाठवले आहे. यापूर्वी १० मीटर अंतराची मर्यादा होती. ती बंद करून अचानक १०० मीटरचे धोरण अवलंबले. त्यामुळे नवीन बांधकामाला सिडको परवानगी देत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांनी उपसरपंच नागेश कुठारे, माजी जि. प. अध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीस सिडकोचे आनंद पाटील, कृष्णा वाघ, कल्पना वाघमारे, प्रतिभा डोसे, कल्याणी कोतेवार, मंगला लाजूरकर, सी. के. भावसार, अशोक वानरे, सिताराम मुरकुटे, बाबासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
Ntv न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400