शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका नवा खुलासा केला आहे. त्यांच्या ‘सामना’तल्या ‘रोखठोक’ या सदरात त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद हे पाचही वर्षं शिवसेनेकडेच राहील हे जाहीर करुन नव्या चर्चेला दार खुलं केलं आहे.
अद्याप ‘राष्ट्रवादी’ आणि ‘कॉंग्रेस’च्या सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यावर जाहीर प्रतिक्रिया आली नसली, तरीही पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल एवढा स्पष्ट निर्णय जाहीर करुन ‘महाविकास आघाडी’वर गंभीर परिणाम करु शकणाऱ्या विषयाला त्यांनी तोंड फोडलं आहे, अशी चर्चा आहे.
सरकारस्थापनेपासून आजपर्यंत या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला काय आहे यावर कोणाही पक्षाच्या नेतृत्वानं स्पष्ट निर्णय सांगितला नव्हता. राऊतांनी पहिल्यांदाच सेनेकडे पाच वर्षं मुख्यमंत्रिपद राहील असं स्पष्ट शब्दात म्हटलं आहे.