
आपल्या सामाजिक कार्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजविणाऱ्या,, अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी या गॅलेक्सी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने त्यांची लेकरं पुन्हा एकदा अनाथ आणि मायेला पोरकी झालीत.

सिंधुताईंचा खडतर जीवन प्रवास…
अनाथ लेकरांची आई म्हणून अवघ्या महाराष्ट्राला माहीत असलेल्या सिंधुताईंचा जीवन प्रवास अतिशय खडतर होता. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात झाला. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे.. सिंधुताई सपकाळ यांना शिक्षणाची आवड होती. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सिंधुताई यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी विवाह झाला. लग्नानंतर देखील त्यांचा संघर्ष काही संपला नाही. त्यांना काही कारणास्तव घर सोडावे लागले. त्यांनी अन्यायाला वाचा फोडली खरी,, पण त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचे चारित्र्य मलिन करणारे आरोप झाले, सासरच्यांनीही साथ सोडली अन् तिथून सुरू झाला सिंधूताईंचा संघर्ष. बेघर झाल्यानंतर त्या भटकत राहिल्या. गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकावर त्यांना भीक मागावी लागली. वेळ प्रसंगी स्मशानभूमीत राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली, स्वतःला आणि मुलीला जगविण्याचा त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाज सेवेकडे वळवलं..

स्वत:ची भूक भागवितानाच अन्य भुकेल्यांना आपल्या घासातील घास देत त्यांनी जगावेगळा प्रपंच सुरू केला आणि नंतर तो चांगलाच फुलला. त्यांना अनाथांच्या प्रश्नांचे दर्शन झाले. यातच अनाथांची आई होण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. भुकेलाच त्या आपली प्रेरणा मानत होत्या. वात्सल्यसिंधु अशा सिंधुताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला. बालपणी आलेल्या अनुभवांमुळं अनाथ मुलांच्या जीवनातील संघर्ष कमी करण्यासाठी अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्था सुरु केली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईनी आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम स्थापन केले त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांना मदत केली.


आईपण’ काय असतं याचं बीज त्यांनी पेरले त्यांनी अनेक मुलांचे संगोपन केले. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई ‘मी हजारहून अधिक मुलांची आई आहे’ असं त्या अभिमानाने सांगायच्या . अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळ याचं वक्तृत्वावरही चांगलं प्रभुत्व होतं. कार्यक्रमांमध्ये त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमायची. भाषणांदरम्यान स्वतःच्या जीवनाची कर्मकहाणी सांगतानाच ऊर्दूतील शेर आणि मराठी कवितांच्या ओळी यांच्या माध्यमातून त्या मनं जिंकून घेत असे…



आजवर सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.“मी सिंधुताई सपकाळ” या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपटाची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती. २०१० साली सिंधुताई यांना महाराष्ट्र सरकारच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्र सरकारकडून 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

गेली 40 वर्षं त्या सामाजिक कार्य करत होत्या. जगाने पाठ फिरवलेल्या लेकरांना जिथून जिथून उचलून त्यांनी वाढवलंय, ती मुलं मोठी होऊन आज जगभरात पसरलीयत. त्यांच्या रुपात सिंधुताई जगभरात रुजल्यात, दुःखाचा डोंगर पेलून त्यांनी माया, प्रेम अबाधित ठेवलं.
प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभ्या केलेल्या कामाची राज्यासह राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा झाली. सिंधूताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे.
प्रकृती अस्वस्थामुळे सिंधुताई सपकाळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कमी अधिक सुधारणा होत होती. प्रकृती खालावल्याने त्यांना गेल्या आठ दिवसांपूर्वी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. अन् सिंधुताई यांची प्राणज्योत मालवली.

शेवट्या क्षणापर्यंत सांभाळलेल्या हजारो लेकरांची चौकशी सिंधुताई करीत होत्या. माझी मुलं कशी आहेत, लेकरांची काळजी घ्या”; असे सिंधुताई सपकाळ यांचे अखेरचे शब्द हे आहेत अखेरच्या श्वासापर्यंत अनाथांचाच विचार सिंधुताईंच्या मनात होता… एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी मातृदेवताच आपल्यातून हरपली आहे. ‘अवघा महाराष्ट्र आज पोरका झाला.
सिंधूताईंच्या अचानक जाण्याने सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, हजारो अनाथ/निराधार बालकांचा सांभाळ, त्यांचे शिक्षण, नंतर लग्न करून देणे अशी समाजसेवा तारेवरची कसरत, या त्यांच्या अप्रतिम कामासाठी ntv news मराठी परीवराकडून मानाचा मुजरा, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो… 🙏🙏