सामाजिक व्यवस्था बदलण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान…….. प्रा.अनिल वैद्य
जाफराबाद प्रतिनिधी: दिनांक १०/०४/२०२६, येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सातवे पुष्प प्रा.अनिल वैद्य यांनी “डॉ.आंबेडकर यांचे सामाजिक कार्य” या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल भाऊ म्हस्के होते तर उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. वैद्य यांनी आपल्या व्याख्यानात डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजातील अस्पृश्यता, जातिभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध केलेल्या संघर्षाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा पुरस्कार करत वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर कार्य केले, असे त्यांनी सांगितले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी महाड सत्याग्रह, चवदार तळे आंदोलन आणि मंदिरप्रवेश आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक चळवळींचा उल्लेख करून सामाजिक क्रांतीत डॉ. आंबेडकर यांचे योगदान अधोरेखित केले. तसेच भारतीय राज्यघटनेद्वारे त्यांनी सर्व नागरिकांना समान हक्क व स्वातंत्र्य मिळवून दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुलभाऊ म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वतंत्रपूर्व काळातील सामाजिक परिस्थिती आणि डॉ.आंबेडकर यांच्या कार्यामुळे झालेला बदल याचे सविस्तर विवेचन केले.तसेच वाचनाअभावी निरक्षरपणा व अज्ञाना अभावी काही लोक आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत अशा समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे आणि सध्या भारतीय कायद्याचे राज्य असुन भारतीय राज्यघटनेचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे सांगितले .
कार्यक्रमास कनिष्ठ वरिष्ट विभागातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. सुरेश पांडे यांनी केले तर आभार डॉ. जितेंद्र वाघ यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
