लातूर तालुक्यातील रामेश्वर परिसरात उभारण्यात आलेल्या संत श्री गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा दुसरा बॉयलर अग्नी प्रदीपन १७ सप्टेंबर रोजी करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती पाहता हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.
कारखान्याचे प्रवर्तक श्री तुळशीराम अण्णा कराड, प्रगतशील शेतकरी श्री काशीरामनाना कराड, सौ. कौशल्या कराड, चेअरमन राजेश कराड, सौ. शुभांगी कराड, रणविर कराड आणि देव कराड यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. तत्पूर्वी श्री बालासाहेबतात्या कराड व सौ. आशाताई कराड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी भागधारक, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
चेअरमन राजेश कराड यांनी सांगितले की, गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या सहकार्याने १ लाख ३५ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले. यंदाच्या गळीत हंगामाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेच्या दिवशी गळीत हंगाम सुरू होणार आहे.
११ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरच्या उसाला ३१५१ रुपये, १ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यान ३२५१ रुपये आणि १५ जानेवारीनंतरच्या उसाला ३३५१ रुपये प्रति टन भाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिली उचल २८०० रुपये असून उर्वरित रक्कम दोन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
गाळप झालेल्या उसाचे पेमेंट विश्वकल्याण नागरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचेही राजेश कराड यांनी सांगितले. याशिवाय फोन पे, नगदी रक्कम वितरण, सुरक्षा ठेव आणि कर्ज वाटप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जाहीर केलेल्या भावात वाढ होईल, मात्र भाव कमी होणार नाही, अशी ग्वाही राजेश कराड यांनी दिली. तसेच ११ ऑक्टोबरच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी, भागधारक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष बन्सीभाऊ भिसे, शेत रस्ता समिती सहअध्यक्ष सुरज शिंदे, भाजपा मंडल अध्यक्ष प्रताप पाटील यांच्यासह मनोज कराड, चंद्रसेन लोंढे, गोपाळ पाटील, विजय काळे, विश्वास कावळे, शशिकांत पाटील, अमर शिंदे, डॉ. बाबासाहेब घुले, आदिनाथ मुळे, दिपक वागसकर, बाबा भिसे, अशोक सावंत, अन्वर शेख, भौरवनाथ पिसाळ, श्रीमत नागरगोजे, शुभम खोसे, सचिन लटपरे, राजाभाऊ पवार, बाबासाहेब कदम, रामराव जाधव, सुधाकर कराड, शिवाजी नागरगोजे, अभिनव वायबसे, हनुमंत कतलाकुरे, बालाजी दुटाळ, अल्ताफ शेख, पांडुरंग गडदे, मदन कराड, विष्णु कराड आणि नारायण कराड यांच्यासह कारखान्याचे भागधारक, ऊस उत्पादक, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
