दिवे लावण्याची संस्कृती आहे,दिवे विझवण्याची न्हवे.!

उस्मानाबाद : सध्या वाढदिवस हा पाश्िमात्त्य संस्कृती प्रमाणे सर्रास साजरे करण्यात येत आहेत.केक कापणे, फुगे-फटाके फोडणे,डोक्यात अंडी फोडणे,मध्यपान सेवन अशा स्वरूपात वाढदिवस हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहेत. जेणेकरून वाढदिवस या शब्दातीत “करुणा”,आपुलकी, आत्मीयता आणि संस्कार नेमका काय असतो याचा निश्चितच आजच्या तरुणाई सह पालकांना विसर पडल्याचे दिसत आहे, आणि त्या वाढदिवसाला अर्थ उरल्याचे दिसत नाहीये.


नेमकं वाढदिवस साजरा करणे म्हणजे काय.? त्याचे महत्त्व आणि लाभ यांविषयी शास्त्रीय भाषेत समजून घेऊया जेकी काळाची गरज आहे असे भासत आहे. कारण भारतीय सांस्कृतिचा विसर आजच्या तरुणाईला पडत आहे असे स्पष्ट दिसून येत आहे.सध्या वाढदिवस साजरा करण्याचे सगळीकडे जणू फॅडच झाले आहे. लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये याची जणू क्रेझच झाली आहे.पण ज्या रीतीने, पद्धतीने हा उत्साह साजरा होतोय नक्कीच याचे विपरीत परिणाम उद्भवू शकतात यात शंका नाही.
दि ३० मार्च रोजी असाच काही अनुभव प्रत्यक्ष अनुभवास आला,अक्षरशः तो दृश्य हृदयात खोलवर टोचला गेला, पण असा प्रकार निदान भविष्यात घडू नये यासाठीच हा लेख आहे.त्यामुळे पालकांनी व तरुण वर्गाने यावर नक्की विचार करावा हीच माझी कळकळीची अपेक्षा.
ज्या व्यक्तीचा वाढदिवस होता त्याच्या समोर भलामोठा केक ठेवलेला..! त्यावर एक स्पर्किंग कँडल..कँडल संपताच त्यातील एका मित्राने चार-पाच (कोंबडीची) अंडी त्या मुलाच्या डोक्यात फोडली.. काही क्षणातच दुसऱ्या एका मित्राने तो पूर्ण केक उचलला व त्याच्या(ज्याचा वाढदिवस होता त्याच्या) डोक्यात घातले..संपूर्ण केकचे तुकडे-तुकडे त्यांच्या पूर्ण शरीरावर माखले गेले,त्यातील ८०% केक हे रस्त्यावर, प्रत्येकाच्या पायदळी तुडविले जात होते. रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही खाता येणार नाही असं काही तो पूर्ण केक पायात तुडविले जात होते… हे दृश्य पूर्णपणे हेलावून टाकणारे होते. मी माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यात असे कुटुंब पाहिलोय, ज्यांना दोन वेळचे जेवणही वेळेवर भेटत नाही, असे कुटुंब पाहिलोय ज्या कुटुंबात लहान लहान मुलांना “भात” मिळत नसल्याने मुलं रडतात..मोल मजूरी करणारा पिता मोठ्या आपुलकीने बेकरीच्या दुकानातून आपल्या मुलांना एखादा केकचा तुकडा खरेदी करून त्या तुकड्यात आपली दोन मुलं व पत्नीला खाऊ घालतो,त्या एका तुकड्यात एका गरीब कुटुंबात समाधान, प्रेम, आपुलकी अनुभवली होती.. हे सर्व दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभे होत होते,जेंव्हा रस्त्यावर एका गाडीच्या बोनेटवर केक ठेवून वाढदिवस साजरा करताना तो केक कुणाच्या तोंडात न घालता पूर्णपणे केवळ एकमेकांच्या तोंडाला माखून पायदळी तुडविले जात होते..!
मंडळी,गर्व असावा नक्कीच, पण ‘अन्न’ वाया घालून गर्व, रुबाब, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणे कितपत योग्य आहे.? आप कमाई आणि बाप कमाई असे दोन प्रकार असतात, त्यात आप कमाई वाले तर असे कृत्य करूच शकत नाहीत, नक्कीच “बाप कमाई” असणार यात शंका नाही..! पण पालकांनी यावर विचार मंथन करणे आवश्यक आहे. केक अंगाला लावून त्याची नासाडी करून अन्नाचे वाटोळे करणे हे कसले संस्कार..?यात कुठला सन्मान व कसला मोठेपणा..?एका कामगार कुटुंबात,या महागाईच्या काळात कष्टाचे पैसे खर्च करून दोन अंडी आणून त्याची “अंडाकरी” बनवून एक कुटुंबाचे पूर्ण जेवण पूर्ण होते तर इथे वाढदिवस साजरा करताना त्या व्यक्तीच्या डोक्यात जवळपास १२-१५ अंडी डोक्यात फोडून,अंड्यांची नासाडी करीत जल्लोष साजरा केला जातोय.. खरच हा जल्लोष आहे का..? अंडी हे प्रोटीन चे स्त्रोत आहे, कुपोषित, गरजू आर्थिक दुर्बल कुटुंबाला याची पोषण आहार म्हणून नितांत गरज आहे, असे एखाद्याच्या डोक्यात फोडून “अन्नाचा” अपमान करू नका..!
वाढदिवस साजरा करणे, म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण करतांना मागच्या एक वर्षाच्या काळात ईश्वराने,आपल्या माता पित्यांनी दिलेल्या साधनेच्या संधीसाठी कृतज्ञता व्यक्त करून पुढे अशीच कृपादृष्टी ठेवण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करणे व पुढील वर्षासाठी काही संकल्प घेणे,ना की दिवे विझवीत अंडी फोडुन अन्नाची नासाडी करणे.!

वाढदिवस असा करावा साजरा

लहान मुलांचा व तरुणांचा वाढदिवस असेल तर त्यांचा आई – वडिलांनी त्यांना सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी लवकर उठवावे. पाल्याने उटन्याने अंघोळ करावी. आणि आई व वडिलांनी प्रसन्न स्वरूपात पाल्यास दिव्याने (आरती)ओवळावे आणि जन्मदिन असलेल्या पाल्याने ईश्र्वर आणि आई वडिलांच्या पाया पडून प्रसन्न रूपाने आशीर्वाद घ्यावेत, आणि या वाढदिसानिमित्त संकल्प करावा उज्वल आणि प्रेरणादायी भविष्याचा आणि आई वडिलांच्या सेवेचा. आनंदी व प्रसन्न राहत या दिवशी शक्य असेल तर गरजूंना दान अवश्य करावे ज्या स्वरूपात शक्य असेल त्या. त्याने आत्मीय ताकत मिळण्यास मदत होईल.आपली दिवे लावण्याची संस्कृती आहे! दिवे विझवण्याची नाही. दिवे लावून या भारतात विचारांचा, प्रेररणांचा व उज्वल भविष्याचा प्रकाश केला जातो.आणि हेच आजच्या युवा पिढीतर्फे अपेक्षित आहे यासाठी शासन प्रशासनाची जबाबदारी नसून पालकांची जबाबदारी आहे हेही तितकेच खरे.

दाणे दाणे पे लिखा खाणे वाले का नाम

आठवतं तो क्षण, मुंबई स्वप्नगरीत आपल्या कलागुणांच्या जोरावर काहीतरी बनण्यासाठी आलेल्या तरुणांना दोनवेळा वडापाव खाण्यासाठी काय खटपट करावी लागते..?आठवतं ते क्षण भुकेने व्याकुळ लोकं आपली भूक मिटविण्यासाठी अखेर “लंगर” मध्ये रांग लावतात, लंगर हा एकमेव जणू वरदान आहे त्यां भुकेने व्याकुळ लोकांना.खरच महान आहेत ते लोक जे लंगर चालवितात. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं आणि अन्न परब्रम्ह आहे त्यामुळे अन्नाची नासाडी होऊ नये ते कुणाच्यातरी मुखात जावं हीच अपेक्षा.

(सचिन बिद्री:उमरगा)

        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *