ज्ञानटपरी पेक्षा पानटपरी वर गर्दी का.?

युट्युब मुळे निर्माण झाली जिद्द

(सचिन बिद्री:उमरगा)

तो एका पायाने अपंग, नीट चालताही येत नाही.शाळेत त्याला अनेकजण वर्गमित्र थट्टा करायचे पण तो जिद्दी व धाडसी होता. दहावी झाल्यावर शेतीकडे हातभार लावत असताना त्याला शेतीबद्दल आवड निर्माण झाली व आज एक सधन उत्तम शेतकरी म्हणून परिसरात ख्याती मिळविली असा हा उमरगा तालुक्यातील बेडगा येथील हर्षवर्धन माने.जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी पुस्तकी ज्ञान देण्यापालिकडे जगण्याचा मूलमंत्र दिला त्यामुळे आज धावपळीच्या स्पर्धेच्या युगातही जि प शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत.आज हर्षवर्धन हा तरुण जवळपास ४० एकर शेतजमिनीपैकी संत्र्याची बाग ४ एकर, सीताफळाची ७ एकर,१०- १२ एकर ऊस आणि मिरची ,सोयाबिन, हरभरा,कांदा आदी व इतर पिके घेत काळ्या आईची सेवा करीत देशाचा पोशिंदा बनून हरित क्रांती घडवताना दिसून येतोय.


आजच्या काळात जिथे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळाचे जाळे पसरत चालले आहे पण विद्यार्थ्यांमध्ये संस्काराचा अभाव दिसून येत आहे.हा संस्काराचा अभाव भरून काढण्याची जबाबदारी पालकांची आहे.शाळेत भेटणारे ‘मार्क्स’ (टक्केवारी)त्या विद्यार्थ्यांचे आयुष्य नसून त्याला समाजात व्यवहारात जगताना कुठे, काय, किती व कसं वागावे हे शिकवणे गरजेचे आहे. हे सर्व वाचनातून शक्य आहे त्यामुळे आपल्या पाल्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करा ना की व्हाट्सएपवर चॅटिंग ची.

—//–

युट्युब ने बदलले माझे आयुष्य

“लोकांमध्ये, मित्रांमध्ये वावरताना माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हास्यास्पद असल्याचे मला अनेक वेळा निदर्शनास आले. युट्युब वर निक या ऑस्ट्रेलियन दिव्यांग व्यक्तीची (ज्याला दोन्ही हात व पाय नाहीत)सकारात्मक विचार ऐकले व मी ठरवले की मला तर दोन हात आणि एक धष्ठपुष्ट पाय आहे,माझा केवळ एक पाय अपंग आहे मी का यशस्वी होऊ शकत नाही.?माझ्यात आत्मविश्वस तर होताच पण निक यांच्या विचारामुळे माझ्यात जिद्द निर्माण झाली आज मी शेती मध्ये विविध पिके घेत फळबाग ही फुलविली आहे. माझ्या शेतात २५ ते३० बेरोजगारांना रोजगार देतोय. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुंदर असायला हवा.”– हर्षवर्धन माने,दिव्यांग शेतकरी

एकीकडे बेरोजगारी वाढत आहे हे सत्य असले तरी युवकांची कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी होत चालली आहे हे कटू सत्य आहे. आजच्या युवकांना त्यांच्या पालकांनी पुरविलेले लाड हेच त्या युवकांच्या प्रगतीच्या आड येत आहेत असे म्हणावे लागेल. पाल्यांना लाड पुरावावे पण त्याला काही बंधने असणे आवश्यक असते, लाड शिक्षणाच्या, खान्या पिण्याच्या बाबतीत असावा पण आज हे लाड वाहने खरेदी करून देणे, महागडे मोबाईल घेऊन देणे अश्या स्वरुपात दिसून येत आहेत त्यामुळे पाल्य या महागड्या गाड्या व मोबाईलचा कुठल्या कामाकरिता वापर करत आहेत हे मात्र संबंधित पालक पाहत नाहीत. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये संस्काराचे बीजारोपण केले तरच पाल्य यशाच्या शिखरावर पोहोचण्यास समर्थ ठरतो. हेच संस्कार त्याला जगण्याचा मार्ग दाखवतात व सामाजिक बांधिलकी जोपासण्यात मोठी मदत मदत होते. आणि भविष्यात वृद्धपकाळात आईवडिलांची सेवा करण्यात पाल्य पुढाकार घेतो.पण मुळात आज काही विपरीत चित्र आढळून येत आहे. युवक कोठे जास्त आढळून येतात तर शहरातल्या पान टपरीवर.. तासंतास बसतात त्या चहा टपरीवर, केवळ फुकटच्या गप्पा मारण्यात त्यांना आनंद भेटत असतो.उमरगा शहरात अँड.शितल चव्हाण फाऊंडेशन च्या माध्यमातून अँड शितल चव्हाण यांनी या बाबी लक्षात घेत युवकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी उमरगा शहरात व तालुक्यातील विविध गावात पुस्तक टपरी चालू केली आहे, या ठिकाणी विविध पुस्तके,गृन्थ, कादंबरी आदी मोफत वाचायला भेटतात पण या “ज्ञानटपरी” पेक्षा “पान टपरिवरच” युवकांची गर्दी अधिक दिसून येतेय. ज्या दिवशी “पान टपरी” पेक्षा या “ज्ञानटपरी” वर अधिक युवक दिसतील तो दिवस खऱ्या अर्थाने सोनेरी व ऐतिहासिक ठरणार..! पण तो कधी उजडणार.?हे येणारा काळ ठरवेल.यासाठी पालकांची महत्वाची भूमिका ठरणार आहे हे नक्की.आपला पाल्य दिवसभर काय करतो..?कोणासोबत वावरतो.?कोण कोण त्याचे मित्र आहेत. मोबाईल वर काय करत असतो,काय पाहत असतो.? कोणाशी अधिक संपर्कात असतो.?त्याच्या आवडी निवडी पाहणे व त्याचे काही चुकत असेल तर एक मित्र बनून त्याला योग्य मार्गदर्शन करणे हे प्रथम पालकांचे कर्तव्यच जणू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *