उमर्ग्याच्या जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार..
उस्मानाबाद : उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी या कडक उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पिण्यासाठी सहज पाणी उपलब्ध होण्याहेतु शाळेच्या परिसरातील “मियावाकी” जंगलातील वृक्षांना मातीची भांडी अडकवून त्यात पाणी भरण्यात आले. पाण्यासाठी भटकंती करताना बऱ्याच पक्षांना आपला जीव गमवावा लागत आहे तर वाढता पारा हा संबंध सजीवांना आव्हान ठरत आहे. पक्षांना सहज पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, विविध पक्षांच्या प्रजातींचा बचाव व्हावा या उदात्त हेतूने या जि प शाळेतील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविले असल्याचे मुख्याध्यापक मोरे यांनी सांगितले.
शाळेतील निसर्गरम्य परिसरात कडाक्याच्या आग ओकणाऱ्या उन्हातही मियावाकी जंगलात विविध जाती प्रजातींच्या पक्ष्याचे वावर दिसून येत आहे.या पक्ष्यांना आता या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोय व काही प्रमाणात खाद्य स्वरूपात धान्य ठेवल्याने मोठं आश्रय तथा आधार पक्षांना लाभलं आहे हे नक्किच..! शाळेच्या प्रांगणात एका वर्षांपूर्वी विविध प्रजातींच्या तब्बल पाच हजार वृक्षांची लागवड करून मियावाकी जंगल निर्मिती मुख्याध्याप पद्माकर मोरे यांनी केली होती.आज रोजी येथे हिरव्यागार थंड जंगलात रूपांतर झाले आहे.विविध जातीच्या पक्ष्यांचा वावरही वाढलेला आहे .अशा पक्षांना शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी पाणी उपलब्ध करून दिल्याने परिसरातील नागरिकाकडून व पालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. मुक्या पक्षांना भर उन्हाळ्यात पाणी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची सवय लागली आहे. विद्यार्थी स्वतः दररोज सकाळी पिण्यासाठी पाण्याची बॉटल आणतात आणि शाळेतून घरी जात असताना दीड वाजता परत विद्यार्थी स्वतः झाडावर लावलेल्या भांड्यात पाणी ओतून घरी जात आहेत. त्यामुळे पक्ष्यांना पाणी उपलब्ध झालेले आहे.भर उन्हाळ्यात निरनिराळ्या पक्षाचे सुंदर आवाज कानावर पडत आहेत.पाऊस पडेपर्यंत सतत या भांड्यात पाणी ठेवणार असल्याचे विद्यार्थिनी सुनिता राठोड,वनमाला वाले व इतरांनी एन टी व्ही न्युजशी बोलताना सांगितले.
(सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद)