डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचा वाडा परिसरातील रस्त्यांची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. संतप्त शेकडो नागरिकांनी H प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला असून, ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
गरीबाचा वाडा परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, रिक्षाचालकही या भागात येण्यास नकार देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘माती नको, पक्का रस्ता द्या’ अशी मागणी करत नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.
गेल्या वर्षी याच रस्त्यावर झालेल्या अपघातात प्रमिला कनोजिया यांचा मृत्यू झाल्याचा दाखला नागरिकांनी दिला. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, दोन दिवसांत काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
